अस्वस्थता....

सगळं वातावरण स्तब्ध आहे या क्षणी
झाडाचं पानदेखील हलत नाहीये,
वाऱ्याचं कुठेही अस्तित्व नाहीये
कृत्रिम वारा सोडला तर...

एक विश्रांत संध्याकाळ आहे ही
दिवेलागणीसाठी तयार असलेली,
एका तपस्वी, ध्यानस्थ पुरुषासारखी..

दिवसभराच्या कष्टाने थकलेला जीव,
कोसळणाऱ्या पावसामुळे जड झालेले ढग,
सतत एकमेकांना साद घालून दमलेले पक्षी,
भिजलेले वृक्ष,
आणि थेंबांचा मारा सहन करून कंटाळलेले दगड,
सगळं, अगदी सगळं वातावरण क्षिणलयं...

पण मी,
मी मात्र या वातावरणात शब्दांशी भांडतेय,
मनातल्या सगळ्या भावना कागदावर उतरवण्यासाठी धडपडतेय..

मिळाले आहेत का शब्द मला?
कदाचित हो,
कदाचित नाही..
पण हेच म्हणायचयं का मला?
माहित नाही..
कधी कळेल, काय म्हणायचयं? काय मांडायचयं मला?
ठाऊक नाही..

मांडू शकेनही,
पण त्यासाठी वातावरण, मन सगळचं सर्जनाच्या अधीन झालेलं हवं,
तरच नवनिर्मिती होईल,
शब्दांच्या या जाळ्यातून एक सुंदरशी वीण तयार होईल..
एकसंध नसली तरीही जोडलेली असेल,
या ना त्या धाग्याने..
तसं पहायला गेलं तर एलसंध काहीच नसतं,
आपणच शोधत असतो सगळ्यात संगती..

या रचनेत ना शेवट असेल ना सुरुवात,
पण एखादा धागा नक्की असेल,
शब्दांना बांधून ठेवणारा..
मग ती एखादी जाणीव असो,
भावना असो वा नुसतीच रचना,
पण काहीतरी नक्कीच असेल,
मात्र ते शोधावं लागेल,
शोधावं तर लागेलच.....


Comments

Popular posts from this blog

आभाळ

सोबत

दिल से दिल तक..