स्वातंत्र्यदिन

प्रथम तुम्हा सर्वांना स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा!!

आज १५ ऑगस्ट, भारताचा स्वातंत्र्यदिन,
उत्साही पालकांचा आपल्या चिमुकल्यांना छानश्या पांढऱ्या कुर्ता, धोतर किंवा साडीत सजवण्याचा अजून एक दिवस, लहान मुलांना शाळेत जाऊन ध्वजारोहण करण्याचा दिवस, कॉलेज पास आउट्ससाठी अभिमानाने कॉलेजमध्ये जाऊन, सिनियर, (एन.सी.सी मध्ये असतील तर अजूनच ऐटीत आणि अभिमानाने) म्हणून मिरवून ध्वजारोहण करण्याचा दिवस तरनोकरी करणाऱ्या भारतीयांसाठी हक्काचा बँक हॉलिडे.
मी आता तुम्हाला स्वातंत्र्यदिन म्हणजे काय हे सांगणार नाहीये, कारण ते माहीत असण्याएवढे सुज्ञ तुम्ही आहात. तर, प्रत्येकासाठी वेगळा असतो स्वातंत्र्यदिन आणि प्रजासत्ताकदिन. ह्या दिवशी हमखास पहायला, ऐकायला मिळणाऱ्या गोष्टी बऱ्याच असतात, सुरुवात होते ठिकठिकाणी दिसणाऱ्या झेंड्यांनी, मग पांढऱ्या कपड्यात किंवा तिरंग्याच्या रंगांच्या वेषात उत्साही मुले किंवा तरुणाई, आणि खास ह्या दोन दिवशी वाजणारी देशभक्तीपर गीते. मग ती घरात वाजणारी असोत किंवा गल्लोगल्ली लाउडस्पीकरवर. ती जणू एक अविभाज्य भाग असल्यासारखी वाजत असतात दिवसभर.
पण तुम्हाला माहितीये, बऱ्याचदा हे सगळं लोकांना दाखवण्यासाठी होत असतं, त्यांची बिल्डिंग ध्वजारोहण करतेय, आपण पण करायला हवं, त्यांनी ही गाणी लावलीत आपण अजून मोठ्याने ती गाणी लावायला हवीत. हे असं नसतं, आपल्यापैकी किती जण देशप्रेमाच्या भावनेने ह्या गोष्टी करतो? राष्ट्रगीत ऐकल्यावर स्तब्ध उभं राहून आपला आदर व्यक्त करायचा हे अगदी लहान असताना शाळेत शिकवलं जायचं, तेव्हापासून आजवर कुठेही राष्ट्रगीत लागलं की स्तब्ध उभं रहायचं, उभं राहणं शक्य नसेल तर निदान स्तब्ध रहायचं पण आपण करतो हे सगळं?
प्रत्येक वेळी जेव्हा राष्ट्रगीत माझ्या कानावर पडतं तेव्हा अंगावर काटा येतो आणि नकळत डोळे पाणावतात, आणि हे केवळ लिहायचं म्हणून लिहित नाहीये मी, तर हे खरंच होतं. डोक्यात विचार सुरू होतात की कसा असेल तो काळ? १९४७ चा किंवा पारतंत्र्यातला? काय असेल तो आनंद स्वातंत्र्याचा? कित्येक स्वातंत्र्यसैनिकांची बलिदानं, सहन केलेला अपमान छळ, हे सगळंच. आपल्यापैकी प्रत्येकाला स्वातंत्र्य ह्या शब्दाचा अर्थ माहीत आहे, पण त्या काळातल्या, प्रत्यक्ष ते वातावरण जगलेल्या लोकांना ह्या शब्दाचा जो अर्थ कळला तो आपल्याला किंचितही कळणार नाही कारण आपण स्वतंत्र भारतात जन्म घेतला. तर, हा असा स्वातंत्र्यदिन!
रोज सीमेवर लाखो जवान आपल्या देशाचे रक्षण करत असतात, त्यांच्यासाठी देशसेवा हेच कर्म आणि हाच धर्म असतो, त्यांच्यासाठी हा दिवस काय असेल ह्याची आपण फक्त कल्पना करू शकतो बहुधा.
आपण सामान्य नागरिक, आपण सीमेवर जाऊन लढत नाही, आपण प्रत्यक्ष तिथे जाऊन शत्रूशी दोन हात करत नाही, आपण बंदूक, रायफलही हाती घेत नाही, आपण युनिफॉर्म घालत नाही, आपण छातीवर मेडल्स मिरवत नाही, मृत्यूनंतर आपण शहीदही होत नाही, तिरंग्यात लपेटून आपण अनंतात विलीन होत नाही, हे काहीच आपण करत नाही, पण म्हणून आपण काहीच करू शकत नाही असं नाहीये. छोट्या पातळीवर आपणही काही गोष्टी करू शकतो, त्या अगदी लढाई एवढ्या नसल्या तरी जे देशप्रेम आपल्या मनात आहे ते या गोष्टींमधून नक्की दिसू शकेल.
          अगदी साध्या आहेत काही गोष्टी,  म्हणजे;

  •  उगाच रस्त्यावर टाकणार असू तर झेंडे विकत न घेणं, एक दिवसापुरतं देशप्रेम मिरवून दुसऱ्या दिवशी तेच झेंडे पायदळी न तुडवणं. 
  • एकदाच खरेदी केलेला झेंडा दरवर्षी वापरता आला तर उत्तम. 
  •  जर माझ्यासारखे झेंडा विकत न घेणारे असाल तर पडलेला झेंडा दिसला तर तो उचलणं, कितीही फाटलेला असला तरी तो उचलावा, कारण त्या झेंड्याची शान आणि मान वेगळा आहे, तो त्याला देणं.
  • देशप्रेम म्हणजे केवळ प्रजासत्ताक दिन आणि स्वातंत्र्यदिन नव्हे, त्याहून बरीच मोठी ह्या एका शब्दाची व्याप्ती आहे, ती आपण समजू नाही शकलोरी हरकत नाही, पण निदान ज्यांना ती समजली आहे त्यांचा आदर करणं.
ह्या केवळ मला वाटणाऱ्या काही गोष्टी आहेत, तुमच्या तुमच्यानुसार इतर बऱ्याच गोष्टी असू शकतात, त्या नक्की करा. केवळ एक – दोन दिवशी देशप्रेम उफाळून येऊ देऊ नका, देशप्रेम मनात जपा, ते दाखवायलाचं हवं असंही नसतं, पण जी काही देशाप्रती तुमची भावना आहे ती खरी आणि निर्मळ असली तर ती नक्कीच सुंदर असते.
          हा लेख लिहिण्यामागे आजच्या दिवसाचं केवळ निमित्त होतं, उगाच ज्ञान देणं हा या लेखामागील हेतू नव्हे. कोणाच्याही भावना दुखावल्या गेल्या असतील तर त्याबद्ल मी आधीच माफी मागते.

वंदे मातरम्!




Comments

Post a Comment

Popular posts from this blog

आभाळ

सोबत

ती...